

पुढारी ऑनलाईन: देशातील अनेक राज्यांमध्ये दसऱ्याच्या दिवशी हलका पाऊस झाल्याने, अनेक ठिकाणी दुर्गापूजा विसर्जन आणि रावण दहन कार्यक्रम विस्कळीत झाला. चीनी समुद्रातील नोरू या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवारे वाहत आहेत. हवेतील आर्द्रता वाढल्याने पाऊस पडत आहे. असेच वातावरण ऑक्टोबर मध्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने (https://weather.com/en-IN/india/news/news/2022-10-06-weather-today-october-6-very-heavy-rains-in-uttar-pradesh-uttarakhand) वर्तवली आहे.
'स्कायमेट'च्या म्हणण्यानुसार, आंध्र प्रदेश आणि लगतच्या भागात कमी दाब आणि चक्रीवादळाचे हवामान कायम आहे. कमी दाब आणि चक्रीवादळाचे क्षेत्र हे आंध्र प्रदेशपासून संपूर्ण वायव्य, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशपर्यंत पसरलेले आहे. या पावसामुळे रब्बी पेरणीच्या सुरुवातीच्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, तर भाजीपाला आणि फुलांच्या लागवडीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
हवामान विभागाने देशातील २० राज्यांमध्ये पावसाबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. या राज्यात मेघगर्जनेसह जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.