काश्मिरी पंडितांच्या नरसंहारासंदर्भातील याचिकेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – काश्मीर खोर्यात गेल्या काही दशकांत झालेल्या काश्मिरी पंडितांच्या नरसंहारासंदर्भातील याचिकेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. काश्मीरी पंडितांच्या नरसंहाराची एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, अशी विनंती आशुतोष टपलू यांनी एका याचिकेद्वारे केली होती. नव्वदच्या दशकात ‘जेकेएलएफ’च्या दहशतवाद्यांनी आशुतोष यांचे वडील टिकालाल टपलू यांची निर्घृण हत्या केली होती.
टिकालाल टपलू हे काश्मीर खोर्यातले प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपचे उपाध्यक्ष होते. ३३ वर्षांपूर्वी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी त्यांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली होती. १९८९ मध्ये टपलू यांच्या हत्येनंतर काश्मीरमधून पंडितांच्या पलायनास सुरुवात झाली होती. टपलू यांच्या हत्येनंतर पंडितांच्या हत्येचे एकच सत्र सुरु झाले होते.
सर्वोच्च न्यायालयाने याआधीही काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्याच्या काही याचिका फेटाळून लावलेल्या आहेत. चालू महिन्याच्या सुरुवातीला वुई दि सिटीझन्स नावाच्या संस्थेने याबाबत दाखल केलेली याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. यासंदर्भात आधी केंद्र सरकारकडे दाद मागा, असे त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. तीन दशकांनंतर शीखविरोधी दंगलीची चौकशी होऊ शकते तर काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराची चौकशी का होऊ शकत नाही, असा युक्तिवाद त्यावेळी वुई दि सिटीझन्स संघटनेने केला होता.
हेही वाचा :
- Monkeypox in China : मंकीपॉक्सचा रुग्ण आढळल्यानंतर चीनच्या ‘त्या’ आदेशामुळे नवा वाद
- Cryptocurrency Prices Today | क्रिफ्टो बाजारात हाहाकार, Bitcoin, Ether सह या क्रिप्टोकरन्सींमध्ये मोठी घसरण, जाणून घ्या कारण
- Google Mistake : गुगलने चुकून एका हॅकरला पाठवले 2 कोटी रुपये, ट्विट व्हायरल…वाचा काय म्हणाले गुगल