पटणा : पुढारी वृत्तसेवा : रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे शिवछत्रपती आणि बहूजन हिताय, बहूजन सुखाय या ध्येयाने सर्व जाती-धर्मियांच्या विकासासाठी आपले आयुष्य खर्च करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार देश पातळीवरच नव्हे तर जगभर पोहचविण्यासाठी सदैव प्रयत्नशील व कटिबद्ध आहे, अशी ग्वाही माजी खा. संभाजीराजे यानी दिली.
बिहार येथील अखिल भारतीय पिछडा वर्ग संघाचा अमृतमहोत्सवी वर्धापनदिन राजधानी पटणा येथे झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संभाजीराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी कुर्मी क्षत्रिय समाजाचे नेते व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी त्यागमुर्ती आर.एल.चंदापुरी यांनी बहुजन समाजाच्या न्याय हक्कांसाठी 75 वर्षांपूर्वी ही संघटना स्थापन केली आहे. त्यांचे यथोचित स्मारक पटना येथे उभारले जावे, अशी समाजबांधवांची मागणी यावेळी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज आर्ग्याहून परतताना पटना येथे आल्याचे लोकांकडून सांगितले जाते. तसचे छत्रपती शाहू महाराज यांना 'राजर्षी' ही उपाधी उत्तरप्रदेशातील कानपूर येथील कुर्मी समाजाने दिली होती. कार्यक्रमास उत्तर भारतातून संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.