गुलाम नबी आझाद यांची माेठी घोषणा : नवीन पक्षाचे नाव ठरविणार जम्‍मू-काश्‍मीरमधील जनता | पुढारी

गुलाम नबी आझाद यांची माेठी घोषणा : नवीन पक्षाचे नाव ठरविणार जम्‍मू-काश्‍मीरमधील जनता

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मी अद्‍याप माझ्‍या पक्षाचे नाव ठरवलेले नाही. जम्‍मू-काश्‍मीरमधील जनताच माझ्‍या नवीन पक्षाचे नाव आणि झेंडा कसा असावा हे ठरवेल, अशी घोषणा काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी आज ( दि. ४ ) जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये आयोजित जाहीर सभेत केली. जम्‍मू-काश्‍मीरला राज्‍याचा दर्जा देणे, राज्‍यात परप्रातीय नागरिकांना जमीन खरेदीचा हक्‍क असून नये आणि राज्‍यातील रोजगार हे केवळ स्‍थानिक नागरिकांनाच मिळावेत, हे पक्षाचे तीन प्रमुख उद्देश असतील, असेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

त्‍यांची झेप केवळ ट्वीट आणि एसएमएसपर्यंतच

काँग्रेसला सोडचिठ्‍ठी दिल्‍यानंतर गुलाम नबी आझाद यांची जम्‍मूत आज पहिली जाहीर सभा झाली. या वेळी आझाद म्‍हणाले की, काँग्रेस पक्षासाठी आम्‍ही रक्‍त सांडले आहे. पक्ष सोडल्‍यानंतर आमच्‍याविरोधात अफवा पसरवल्‍या जात आहेत. मात्र आमच्‍यावर आराेप करणार्‍यांची झेप केवळ ट्वीट, एसएमएस आणि कम्‍युप्‍टर एवढीच मर्यादीत आहे. ते केवळ चर्चेत आनंद राहू देत, हेच त्‍यांचे नशीब आहे. आम्‍ही देशातील ज्‍येष्‍ठ नागरिक आणि शेतकर्‍यांबरोबर आहोत. त्‍यांना त्‍यांची राजेशाही मिळू देते, असा टोलाही त्‍यांनी काँग्रेसवर अप्रत्‍यक्षपणे केला.

आझाद यांनी २६ ऑगस्‍ट रोजी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. यानंतर जम्‍मू-काश्‍मीर विधानसभेचे माजी उपाध्‍यक्षांसासह काँग्रेसच्‍या चार नेत्‍यांनी राजीनामा दिला होता. तसेच माजी उपमुख्‍यमंत्री तारा चंद, माजी मंत्री माजिद वानी आणि मनोहर लाल शर्मा यांनीही काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता.

 

Back to top button