बिहारमध्ये ३१ पैकी १६ मंत्रिपदे ‘राजद’ला

बिहारमध्ये ३१ पैकी १६ मंत्रिपदे ‘राजद’ला
Published on
Updated on

पाटणा; वृत्तसंस्था : बिहारमध्ये 10 ऑगस्ट रोजी नितीशकुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर एका आठवड्याने बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. मंगळवारी 31 जणांचा शपथविधी झाला. यातील सर्वाधिक 16 मंत्री लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे असून, 11 जण संयुक्‍त जनता दलाचे आहेत. काँग्रेसचे दोन, हम पक्षाचा 1 आणि एका अपक्षालाही मंत्रिमंडळात स्थान दिले आहे.

सर्वाधिक महत्त्वाची खाती संयुक्‍त जनता दलाकडे आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्वतःकडे गृह, सामान्य प्रशासन यासह पाच खाती ठेवली आहेत. अर्थ खातेही 'संजद'च्या विजय चौधरींकडे आहे. उपमुख्यमंत्री आणि 'राजद'चे नेते तेजस्वी यादव यांच्याकडे आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि ग्रामीण कार्य मंत्रालय दिले आहे. तर लालूप्रसाद यांचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप यांच्याकडे पर्यावरण, वने, जलवायू परिवर्तन ही खाती दिली आहेत. काँग्रेसच्या 19 पैकी केवळ दोघांना मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यांच्याकडे पंचायतराज, मत्स्य आणि पशुपालन हे विभाग आहेत.

मंत्रिवाटपातील जातीय समीकरणे

नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात गतवेळीपेक्षा यंदा मागास, दलित जातींना जास्त संधी मिळाली आहे. 8 मंत्री यादव या समाजातील आहेत. मागास आणि अतिमागास जातींतील मिळून 17 मंत्री आहेत. यात 5 दलित, 5 मुस्लिम चेहरे आहेत. 'रालोआ' सरकारमध्ये 11 मंत्री उच्च जातींमधून होते. ती संख्या आता सहावर आली आहे.

प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न

बिहारमधील मिथिलांचल विभागातील सर्वाधिक 10 मंत्री बनले आहेत. त्यानंतर भोजपूर-शाहाबाद या विभागातून 7, मगध विभागातून 4, कोशी विभागातून 2, सीमांचल विभागातून 3 आणि अंग प्रदेशातून 2 मंत्री बनले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news