![Draupadi Murmu](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F07%2F9-11-34.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : द्रौपदी मुर्मू भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आणि भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. २५ जूलै रोजी त्या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. क्लर्क ते भारताच्या राष्ट्रपती हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. जाणून घेऊया भारताच्या राष्ट्रपती आणि भारताच्या प्रथम नागरिक द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या विषयी.
भाजप पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) वतीने राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या नावाची घाेषणा करण्यात आली. विविध राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. फक्त राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि त्यांच्या गटातील पक्षांनीच नाही तर त्यांना विरोधी पक्षांनीसुद्धा जाहीर पाठिंबा दिला. राष्ट्रपतीपदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी २० नावांची चर्चा सुरू होती. अखेर ओडिसाच्या द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी यासंदर्भातील घोषणा केली होती. यापूर्वीही म्हणजे २०१७ मध्ये त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. त्याचवेळी राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली हाेती. मात्र, त्यावेळी रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामाेर्तब झाले.
राष्ट्रपती पदासाठी सोमवारी (१८ जुलै २०२२) देशभरात मतदान झाले. आज (२१ जुलै) या निवडणुकीचा निकाल लागला. द्रौपदी मुर्मू यांना २१६१ मते (मूल्य ५,७७,७७७) तर त्यांच्या विरोधात उभे असणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना १०५८ मते (मूल्य २,६२,०६२) मते पडली. या विजयाने मुर्मू या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. तर, भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील निवडून आल्या होत्या.
द्रौपदी मुर्मू यांचा आजपर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा आहे. त्यांचा जन्म ओडिसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात २० जून १९५८ रोजी झाला. त्यांचे वडील बिरंची नारायण टुडू हे संथाल आदिवासी जमातीचे तालुका प्रमुख होते. आजोबाही तालुका प्रमुख होते. १९७९ मध्ये भुवनेश्वरमधील रमादेवी महिला विद्यापीठातून त्यांनी कला (Arts) शाखेतून पदवी घेतली.
देशाचे सहावे राष्ट्रपती नीलम रेड्डी यांनी २५ जुलैला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. तेव्हापासून, प्रत्येक वेळी २५ जुलै रोजी नवीन राष्ट्रपती कार्यकाळ सांभाळतात. द्रौपदी मुर्मू याही २५ जुलै रोजी भारताच्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल २५ जुलैला संपणार आहे.
हेही वाचलंत का?