भारताची डिजिटल अर्थव्यवस्था 2025 मध्ये 1 ट्रिलियन डॉलर होणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : सध्या भारतात वेगाने डिजिटलाईजेशन होत आहे. त्यामुळे 2025 पर्यंत भारताची डिजिटल अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ब्रिक्स बिझनेेस फोरम परिषदेला पंतप्रधान मोदी बुधवारी संबोधित करत होते.
ते म्हणाले, भारताचा पायाभूत सुविधांचा विस्तार होत आहे.त्यामध्ये व्यापकरीतीने सुधारणाही केल्या जात आहेत. यासाठी एक राष्ट्रीय मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. राष्ट्रीय पायाभूत पाईपलाईन योजनेतंर्गत 1.5 ट्रिलियन डॉलर गुंतवणूकीची संधी आहे. कोरोना काळात भारतीय व्यापारामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्यासाठी सुधारित नियमावली तयार केली जात आहे. देशात स्टार्टअप्सची संख्या वाढत आहे. सरकारी धोरणांमध्ये पारदर्शकता आणि स्थिरता आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तंत्रज्ञानामुळे भारताच्या विकासात मोठ्याप्रमाणावर भर पडली आहे. देशातील प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व बदल होत आहे. कोरोनानंतर जगभरात अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. यामध्ये ब्रिक्स देशांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.