देशात वर्षाच्या अखेरीस मिळणार 5G सेवा, सरकारचा मोठा निर्णय | पुढारी

देशात वर्षाच्या अखेरीस मिळणार 5G सेवा, सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याच्या पार्श्वभूमीवर दूरसंचार क्षेत्रातील धुरिणांनी चालू वर्षाच्या अखेरपासून 5G सेवा सुरू होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकताच स्पेक्ट्रम लिलावाला मंजुरी देण्यात आली होती.
लिलावात यशस्वी ठरणाऱ्या कंपन्या देशभरात 5G सेवा देण्यास सुरुवात करू शकतात, असे दूरसंचार मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी निश्चित अशी वेळ ठरविण्यात आली नसली तरी, साधारणतः वर्षाच्या अखेरपासून लोकांना 5G चा लाभ घेता येईल, असे मानले जात आहे.

4G च्या तुलनेत 5G इंटरनेटचा वेग कितीतरी जास्त असणार आहे. दूरसंचार मंत्रालयाने दिलेल्या प्रस्तावानुसार 5G स्पेक्ट्रमचा 72 जीएचझेड बँडचा पुढील वीस वर्षांसाठी लिलाव केला जाईल. विशेष म्हणजे अनेक दूरसंचार कंपन्या मागील काही काळापासून 5G सेवेसाठी ट्रायल करीत आहेत. यात डाउनलोड आणि अपलोडसाठी जास्त स्पीड पहावयास मिळत आहे.
5 जी स्पेक्ट्रमसाठी दूरसंचार कंपन्यांकडून आवश्यक त्या पायाभूत सुविधांची निर्मिती देखील केली जात आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या महानगरात ही सेवा सुरू केली जाईल, तर त्यानंतर देशातील मोठ्या शहरांत या सेवेचा प्रारंभ केला जाणार आहे. स्पेक्ट्रम लिलावात 600 एमएचझेड, 700 एमएचझेड, 800 एमएचझेड, 900 एमएचझेड, 1800 एमएचझेड, 2100 एमएचझेड, 2300 एमएचझेड तसेच 3300 एमएचझेड फ्रीक्वेंसी बँडचा समावेश असणार आहे.

Back to top button