Target Killing : पाकिस्तान घडवून आणतंय काश्मिरी पंडितांच्या हत्या, आयएसआयने रचलाय कट; भाजप नेते रविंद्र रैनांचा आरोप | पुढारी

Target Killing : पाकिस्तान घडवून आणतंय काश्मिरी पंडितांच्या हत्या, आयएसआयने रचलाय कट; भाजप नेते रविंद्र रैनांचा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून हिंदू पंडितांच्या हत्या करण्यात येत आहेत. या घटनांमुळे येथील स्थानिक हिंदू पंडित कुटुंबिय भीतीच्या सावटाखाली आहेत. दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांनी काश्मीरच्या खोऱ्यामधून पलायन करण्यास सुरुवात केल्याचे पुढे आले आहे. (target killing)

दरम्यान भाजपचे नेते रविंद्र रैना यांनी या प्रकरणावरून मोठी प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून करण्यात येत असलेल्या काश्मीरी पंडीतांच्या हत्या हे पाकिस्तानचे षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे.

गुरुवारी कुलगाम जिल्ह्यात राजस्थानातील एका बँक व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मृत विजय कुमार हे कुलगाम जिल्ह्यातील आरेह मोहनपोरा येथील देहाती बँकेत कार्यरत होते. त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र रैना यांनी पाकिस्तान आणि त्यांची गुप्तचर संघटना आयएसआयवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘जम्मू-काश्मीरमधील सामाजिक वातावरण हळूहळू शांतता आणि बंधुतेकडे वाटचाल करत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मोठ्या विकास प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. केंद्राच्या सर्व योजना जनतेच्या भल्यासाठी राबविल्या जात आहेत. पण पाकिस्तानला हे बघवत नाही. त्यामुळे येथे पुन्हा एकदा अशांतता माजवण्यासाठी त्यांनी दहशतवादी संघटनांना हाताशी धरून मोठा कट रचला आहे. काश्मीरी पंडितांची हत्या त्यातूनच होत आहे. पण येथील जनतेसह भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानचा प्रत्येक कट वेळोवेळी हाणून पाडला आहे, हे पाकिस्तानने लक्षात घ्यावे.’ (target killing)

रवींद्र रैना पुढे म्हणाले, ‘1984-85 मध्ये पाकिस्तान सरकारने ऑपरेशन टोपेक सुरू केले आणि जम्मू-काश्मीरमध्ये जिहादच्या नावाखाली काश्मीरमधील काश्मीर पंडित, काश्मीरी शीख आणि इतर प्रदेशांतील हिंदूंसह सुफी पंथातील मुस्लिम बांधव आणि भगिनी यांना लक्ष्य केले.’ (target killing)

‘जगात सर्वाधिक मानवी हक्कांचे उल्लंघन पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांनी काश्मिरींचे रक्तपात करून केले आहे. पाकिस्तान आणि दहशतवादी मानवतेची हत्या करत आहेत. त्यांच्या या क्रुरतेने मानवतेला लाज वाटू लागली आहे. भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि निमलष्करी दलाने ऑपरेशन ऑल आऊट राबवून खोऱ्यातील दहशतवादी संघटनांच्या सर्व बड्या म्होरक्यांचा खात्मा केला आहे. आज भारतीय लष्कराने दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले असून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि त्यांच्या लष्कराचे भारतविरोधी मोड्यूल उद्ध्वस्त केले गेले. त्यामुळे हताश झालेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी कार्यपद्धती बदलून आयएएसच्या मदतीने टार्गेट किलिंगचा नवा कट रचला आहे,’ असेही रैना यांनी म्हटले.

कुलगाममध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँक व्यवस्थापकाची हत्या केली. दहशतवाद्यांनी १ मेपासून काश्मीरमध्ये केलेली ही आठवी हत्या असून, या हत्यासत्राचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. काश्मीर खोऱ्यातील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली.

Back to top button