कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६९ डॉक्टरांचा बळी!
![](https://pudhari.news/wp-content/uploads/2021/06/Pudhari-Featured-Image.jpg)
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत २६९ डॉक्टरांचा बळी गेला असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनकडून (आयएमए) देण्यात आली आहे. आरोग्य सुविधांचा वाणवा असलेल्या बिहारमध्ये सर्वात जास्त ७८ डॉक्टर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले असून त्याखालोखाल उत्तर प्रदेशात ३७ डॉक्टरांचा बळी गेला आहे.
गेल्या अडीच महिन्यापासून महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात १४ डॉक्टरांचा मृत्यू झाला असल्याचेही आयएमएकडून सांगण्यात आले. गतवर्षी कोरोना संसर्गाची पहिली लाट आली होती, त्यावेळी ७४८ डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत दुसऱ्या लाटेत बळी पडलेल्या डॉक्टरांची संख्या सुदैवाने कमी आहे. दुसऱ्या लाटेत देशाची राजधानी दिल्लीमध्ये २८ डॉक्टर मृत्यूमुखी पडले असून आंध्र प्रदेशात २२ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट अद्यापही कमी झालेले नाही. गेल्या चोवीस तासात मृतांच्या आकड्याने नवा विक्रम केला आहे. या कालावधीत ४३२९ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. नवीन रुग्णसंख्या वाढ त्या मानाने कमी असली तरी मृतांचा आकडा चिंताजनक असल्याचे आयएमएचे म्हणणे आहे.