संजय राऊतांची शांतीत ‘क्रांती’ ! दिल्लीत भाजप खासदार वरुण गांधींसोबत ३ तास ‘डिनर पे चर्चा’ | पुढारी

संजय राऊतांची शांतीत 'क्रांती' ! दिल्लीत भाजप खासदार वरुण गांधींसोबत ३ तास 'डिनर पे चर्चा'

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात मौन की बात करण्याचा नारा दिला असला, तरी दिल्लीतील त्यांच्या डिनर डिप्लोमसीने चांगलीच चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन, महागाई आदी मुद्यांवरून भाजपवर प्रहार करणाऱ्या खासदार वरुण गांधी यांनी संजय राऊत यांची भेट घेतल्याने राजकीय भूवया उंचावल्या आहेत.

डिनर डिप्लोमसीमध्ये कोणत्या मुद्यावर चर्चा झाली हे गुलदस्त्यात असले, तरी संभाव्य राजकीय प्रवासावर चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर कडाडून प्रहार करत थेट अंगावर घेतले आहे. त्यांच्यामागे ईडी कारवाई ससेमीरा लागूनही त्यांनी भाजपविरोधात आक्रमक बाणा कमी केलेला नाही. त्यामुळे भाजप नेते आणि संजय राऊत शाब्दिक युद्ध दररोज होत आहे. दुसरीकडे वरुण गांधी यांनीही भाजपवर कडाडून प्रहार केला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये संजय राऊत यांचा गांधी घराण्यातील वावर चांगलाच वाढला आहे. आता त्यामध्ये वरुण गांधी यांच्या नावाची भर पडली आहे. राज्यात भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे. दुसरीकडे वरूण गांधी भाजप खासदार असूनही त्यांनी अनेक मुद्यावर मोदी सरकारला घेरताना कठोर शब्दात टीका केली आहे. त्यामुळे ते भाजपला रामराम करण्याच्या तयारीत आहेत का ? याची चर्चा सुरु झाली आहे.

सध्या ते भाजपपासून अंतर ठेवून आहेत. भाजपनेही त्यांना संदेश देत बंडखोरी खपवून घेणार नसल्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे उभय नेत्यांमध्ये नेमकी याच अनुषंगाने चर्चा झाली असावी असा राजकीय वर्तुळातून कयास बांधला जात आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button