

हैदराबाद; पुढारी ऑनलाईन
सिकंदराबादच्या भोईगुडा येथे लाकडाच्या वखारीला लागलेल्या आगीत ११ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेतून १२ पैकी केवळ एकच व्यक्ती बचावला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास केला जात असल्याची माहिती गांधीनगरचे स्टेशन ऑफिस अधिकारी मोहन राव यांनी दिली आहे.
वखारीला लागलेल्या आगीने काही क्षणात रौद्ररुप धारण केले. वखारीत लाकडाचा भुसा देखील होते. ज्यावेळी आग लागली होती त्यावेळी वखारीतील कामगार झोपेत होते. ४ ते ५ कामगार वखारीतून कसेबसे बाहेर पडले. पण ११ जण आत अडकून पडल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे तासभर शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेतील मृत कामगार बिहारमधील आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या मजल्यावर १२ कामगार झोपले असताना तळमजल्यावर आग लागली. यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांनी कामगारांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.