नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीमध्ये शुक्रवारी (दि.28) मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. या सोबतच कित्येक ठिकाणचे रस्तेसुद्धा बंद झाले होते. या मुसळधार पावसामध्ये जवळपास 11 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही बालकांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर पावसामुळे बुडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना दिल्ली सरकारने 10 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीच्या जलमंत्री अतिशी यांनी नुकसान भरपाई देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
दिल्ली सरकारमधील जलमंत्री अतिशी यांनी महसूल विभागासह दिल्ली पोलिस आणि यंत्रणेला मदती संदर्भात सूचना दिल्या आहेत. 28 जूनला झालेल्या पावसात ज्यांनी प्राण गमावले त्यांची ओळख पटवून त्यांना नुकसान भरपाई त्वरित देण्याचे निर्देश दिले आहेत.
दोन दिवसांपूर्वी 28 जूनला दिल्लीसह परिसरात मोठा पाऊस झाला. यंदा पडलेला हा सर्वात मोठा पाऊस आहे. 24 तासामध्ये 228 मीमी पाऊस पडला होता. यामध्ये अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पाणी साचले होते, अनेक रस्ते बंद झाले होते, सखल भागात पाणी साचल्यामुळे काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले. वाहतूक व्यवस्थेवरही याचा परिणाम झाला होता. काही ठिकाणी लोकांना साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे ११ लोकांचा जीव गेला.