नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांसाठी १ हजार ४९२ कोटी रुपयांचा निधी मंगळवारी जारी केला. आसाम, मिझोराम, केरळ, त्रिपुरा, नागालँड, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मणिपूर या पूरग्रस्त राज्यांमध्ये नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी सरकारने आंतर-मंत्रालयीय केंद्रीय पथके पाठवली होती. त्यांच्या अहवालानंतर हा निधी जारी करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रासह इतर १३ पूरग्रस्त राज्यांसाठी ५,८५८.६० कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशला १ हजार ३६ कोटी, आसामला ७१६ कोटी, बिहारला ६५५.६० कोटी, गुजरातला ६०० कोटी, पश्चिम बंगालला ४६८ कोटी, तेलंगणाला ४१६.८० कोटी, हिमाचल प्रदेशला १८९.२० कोटी, केरळला १४५.६० कोटी निधी जारी केला आहे. याव्यतिरिक्त मिझोरामला ५० कोटी, नागालँडला २१.६० कोटी, सिक्कीमला १९.२० कोटी, त्रिपुराला २५ कोटी देण्यात आले आहेत. या राज्यांना यावर्षी मान्सूनमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाचा फटका बसला आहे.
याव्यतिरिक्त, केंद्र सरकार लवकरच बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये पूर नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी पथके पाठवणार आहे. या दोन्ही राज्यांना नुकताच पुराचा फटका बसला आहे. पथकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अतिरिक्त आर्थिक मदत या राज्यांना मंजूर केली जाईल.