

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकात सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपमध्ये म्हैसूर विमानतळाच्या नामांतरावरुन हिवाळी अधिवेशनात संघर्ष सुरु झाला आहे. काँग्रेसचे आमदार प्रसाद अब्बय्या यांनी म्हैसूर विमानतळाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यानंतर भाजप आमदारांकडून काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेस आमदाराच्या या मागणीमुळे कर्नाटकात राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपने काँग्रेसच्या या प्रस्तावला कडाडून विरोध दर्शवला आहे. (Mysuru airport)
कर्नाटक विधानसभेच्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान काँग्रेस आमदार प्रसाद अब्बय्या यांनी म्हैसूर विमानतळाचे नाव टिपू सुलतानच्या नावावर ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, त्यामुळे भाजप आमदारांकडून तीव्र टीका होत आहे. प्रसाद अब्बया हे हुबळी-धारवाड (पूर्व) चे आमदार आहेत. (Mysuru airport)
"आमच्या हुबली विमानतळाला सांगोली रायण्णा नाव द्यायचे आहे. बेळगावी विमानतळाचे नाव कित्तूर राणी चेन्नम्मा तर शिवमोग्गा विमानतळाचे नाव राष्ट्रकवी कुवेंपू असे करायचे आहे. शिवाय विजापूर विमानतळाला नाव जगज्योती बसवण्णा यांचे नाव द्यायचे आहे," अब्बय्या पुढे म्हणाले. इतिहासकार सांगतात की, "टिपू सुलतान ब्रिटिशांचे कट्टर विरोधक होते. राजधानी श्रीरंगपट्टणमचे रक्षण करताना ते इंग्रजांकडून मारले गेले होते." कर्नाटकात २०१६ पासून तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांची जयंती साजरी करण्यात सुरुवात केली. (Mysuru airport)