

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमधील जात सर्वेक्षण ( Bihar caste survey ) हा राजकारणाच्या तुष्टीकरणाचा प्रकार आहे. या जात सर्वेक्षणात राज्यातील मुस्लिम आणि यादव लोकसंख्या वाढवली आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah ) यांनी केला. मुझफ्फरपूर जिल्ह्यात आज (दि.५) एका सभेमध्ये ते बोलत होते. राज्यात जात सर्वेक्षण करण्याचा निर्णय नितीश कुमार यांचा जेडी(यू) एनडीएचा घटक असताना घेण्यात आला होता, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अमित शहा म्हणाले की, बिहारमधील जनता दल संयुक्त ( जेडी(यू) आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आघाडीचे सरकार आहे. यांचा एकमेव अजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणे आहे. आता तरी नितीश कुमार यांनी पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहणे थांबवावे. भारत आघाडीने त्यांना आपले निमंत्रकही बनवले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यातील 'गुंडाराज'साठी जेडी(यू) नेते जबाबदार आहेत, असा आरोप करत अमित शहा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर हल्लाबोल केला. आरजेडी आणि जेडीयू जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या समर्थनात नव्हते. कलम 370 हटवलं तर रक्ताच्या नद्या वाहतील असं लालूप्रसाद यादव म्हणाले होते. लालूजी, रक्ताच्या नद्या सोडा, खडे टाकण्याचे धाडस कोणातच नव्हते, असेही त्यांनी सुनावले.
नितीश कुमार आणि लालू यादव आपल्या कुटुंबाची दुकाने चालवत आहेत, एकाला पंतप्रधान व्हायचे आहे आणि दुसऱ्याला आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचे आहे. मात्र नितीश कुमारांना इंडिया आघाडीच्या संयोजकही बनवले नाही. तेल आणि पाणी कधीच एकत्र येत नाहीत, ते वेगळे राहते, असा टोला लगावत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप बिहारमधील सर्व 40 जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना तत्काळ प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, मी अमित शाह यांचे वक्तव्य ऐकले. जातीनिहाय सर्वेक्षणात यादव आणि मुस्लिमांची लोकसंख्या वाढली असून इतर समाजाची लोकसंख्या कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. मला सांगायचे आहे की सर्वेक्षण चुकीचे असेल तर देशभरात जात जनगणना करा. तुम्हाला कोणी अडवले आहे? तुम्ही देशभरात जातनिहाय सर्वेक्षण का करत नाही, असा सवाल त्यांनी केला.
हेही वाचा :