

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: एक्साईज धोरणात बदल करून मोठी माया जमविल्याचा आरोप झालेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia ) यांनी 'आम आदमी पार्टी तोडण्याचा' संदेश भाजपकडून आल्याचा आरोप केला आहे. 'आप' तोडलात तर सध्या सुरू असलेली तपास संस्थांची कारवाई थांबेल, असे लालूच दाखविण्यात आले आहे. पण मी राजपूत आहे. शिर कापेन पण भ्रष्टाचारी-षड्यंत्र रचणाऱ्यांसमोर झुकणार नाही, असेही सिसोदिया यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे.
माझ्यावर दाखल करण्यात आलेले सगळे गुन्हे खोटे आहेत, जे करायचे आहे ते करा, असे आव्हानदेखील सिसोदिया (Manish Sisodia) यांनी भाजपला दिले आहे. अबकारी धोरणात करण्यात आलेल्या बदलाची चौकशी करण्याची शिफारस उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी सीबीआयला केली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यात सीबीआयने सिसोदिया यांच्या दिल्लीतील निवासस्थानासह सात राज्यांत छापेमारी केली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया हे दोघेही सोमवारी गुजरात दौऱ्यावर रवाना झाले.
या पार्श्वभूमीवर सिसोदिया ट्विटमध्ये पुढे म्हणतात की, गेल्या २७ वर्षात भाजपने गुजरातसाठी जे केले नाही, ते केजरीवाल सरकार करून दाखवेल. ज्या प्रकारचे काम दिल्लीत झाले आहे, तशा प्रकारचे काम सध्या पंजाबमध्ये सुरु आहे. या कामामुळे प्रभावित होऊन गुजरातची जनता केजरीवाल यांना एक संधी देऊ पाहत आहे. दरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल यांनी देखील सिसोदिया यांना जाणीवपूर्वकपणे अबकारी धोरण प्रकरणात अडकवले जात असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.
हेही वाचलंत का ?