वर्धा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात दोन ठिकाणी वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी ३० जून रोजी दुपारी बारा ते एक वाजताच्या सुमारास या घटना घडल्या आहेत. यामध्ये महाकाळ येथे वीज पडून पुरुषाचा तर कोपरा येथे महिलेचा मृत्यू झाला.
गुरुवारी ३० जून रोजी दुपारी बारा वाजताच्या वर्ध्यासह इतरही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. दरम्यान, वीज पडल्याने शहरालगतच्या महाकाळ येथील विलास रामाजी ठाकरे (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. विलास ठाकरे पत्नीसह बकर्या चरण्याकरिता गेले होते. महाकाळ गावालगत असलेल्या धाम प्रकल्पाच्या कालव्याजवळ बकर्या चारत होते. पाऊस सुरू झाला आणि विजांच्या कडकडाटामुळे विलास ठाकरे, त्यांची पत्नी घराकडे परत येत होते. दरम्यान, अचानक वीज पडल्याने विलास ठाकरे यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांची पत्नी दूर अंतरावर असल्याने थोडक्यात बचावल्या.
कोपरा (चाणकी) येथे महिला मृत्यू
कोपरा येथील सुभाष निवल यांच्या तीन एकर शेतामध्ये सोयाबीनची पेरणी सुरू होती. यावेळी पावसाला सुरुवात झाल्यामुळे सगळे एका झाडाखाली थांबले होते. पाऊस थोडा कमी होताच घरी जाण्याकरिता निघाले असताना वीज पडल्याने नीलिमा सुभाष निवल (वय ४७) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.