

Yavatmal Agriculture Loss
यवतमाळ : संपूर्ण मृग नक्षत्रात दडी मारणाऱ्या पावसाने सध्या जोरदार हजेरी लावली. महिनाभरात 225.1 मीमी पावसाची नोंद घेण्यात आली असून, ती मासिक सरासरीच्या तुलनेत 105 टक्के आहे. तर एकूण 48 महसूली मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे 147.70 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात सहा लाख 70 हजार 966 हेक्टरवर खरीप हंगामाची लागवड झाली आहे. मध्यंतरी विजांच्या कडकडाटात कोसळलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली होती. महिन्याभरात वीज पडून चार व्यक्ती, तर 19 जनावरांचा मृत्यू झाला. तर 109 घरांची पडझड झाली आहे. सर्वांधिक नेर आणि आर्णी तालुका पावसामुळे बाधित झाले आहे.
संततधार पावसामुळे जिल्ह्यातील 48 मंडळात अतिवृष्टी झाली. यात यवतमाळातील चार, कळंब दोन, दारव्हा तीन, दिग्रस तीन, नेर चार, उमरखेड एक, महागाव दोन, वणी नऊ, मारेगाव पाच, झरीजामणी पाच, केळापूर दोन, घाटंजी सहा, राळेगाव तालुक्यातील दोन मंडळाचा समावेश आहे.
तर 147.1 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा पंचनामा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. काही भागातील जमीनी खरडून गेल्यामुळे शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 225.1 मीमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. मासिक सरासरीच्या 105 टक्के पाऊस कोसळला आहे. परंतु वार्षिक सरासरीच्या तुलनेत पावसाची तूट स्पष्ट दिसून येत आहे.
प्रकल्पातील जलसाठा वाढला
महिन्याभरात कोसळलेल्या पावसामुळे आजघडीस 40 टक्के जलसाठा आहे. यात पूस 34.33, अरुणावती 41.27 बेंबळा 38.33, गोकी 58.11, वाघाडी 55.58, सायखेडा 49.24, अधरपूस 66. 12, बोरगाव 34.64, अडाण 48.3, नवरगाव 51. 82 टक्के जलसाठा आहे. अशाच प्रकारे पाऊस सुरू राहिल्यास लवकरच प्रकल्प शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.