यवतमाळ : अहमदनगर येथून माहूर येथे रेणुकामातेच्या दर्शनाला जाताना चालकाला डुलकी लागल्याने चारचाकी वाहन झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात पती- पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि.८) पुसद ते वाशिम मार्गावरील सत्तरमाळ घाटात घडली.
मनीषा बबन गुलदगड (वय ५०), बबन किसन गुलदगड (वय ५५, दोघेही रा. राहुरी, जि. अहमदनगर) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. तर चालक मुकुंद दत्तात्रय लांडे (वय ४९), मयूर सुरेश रोकोळे (वय २५), सागर शाळाहारी सरोदे (वय २५), किरण भैरव बोरुडे (वय ३०), सारिका गोरख सुडके (वय ४०), मंदा बाबू गडकल (वय ५०), सार्थक संतोष बोरुडे (वय १३), संतोष लक्ष्मण बोरुडे (वय ४०, सर्व रा. राहुरी, जि. अहमदनगर) अशी जखमींची नावे आहेत.
अहमदनगर येथून दहा भाविक एका वाहनाने (क्र. एमएच १६ एजे ६०१०) रेणुकादेवीच्या दर्शनासाठी माहूरला जात होते. सोमवारी सकाळी साडेसहादरम्यान सत्तारमाळ घाटात चालकाला डुलकी लागली. यामुळे भाविकांचे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या सागाच्या झाडावर आदळले. हा अपघात एवढा भीषण होता की, दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर चालकासह आठ जण गंभीर जखमी झाले. वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. याप्रकरणी चालक मुकुंद लांडे (४९, रा. सुडकेमळा, जि. अहमदनगर) याच्याविरुद्ध खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार देवीदास पाटील करत आहे.