यवतमाळ : कोच्ची (ता. राळेगाव ) गावानजीक असलेल्या वर्धा नदी पात्रातनदीवर अंघोळीसाठी गेलेल्या दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी (दि.7) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नदी पात्रावर तीन मुली गेल्या होत्या. मात्र दोघी बुडू लागल्याने तिसरी नदीत उतरण्या आधीच आरडाओरड करत गावाकडे परत आल्याने ती बचावली. खुशी किशोर राऊत (वय.१३) प्रांजली भानुदास राखुंडे (वय.१४) असे या मृत मुलींची नावे आहेत. या घटनेची तात्काळ माहिती नातेवाईक आणि गावकऱ्यांना मिळाली.
राळेगाव तालुक्यातील खैरी येथील सानिया गजानन बोडे (वय १४) खुशी किशोर राऊत (वय १३) प्रांजली भानुदास राखुंडे (वय १४) रा.कोच्ची या तिन्ही मैत्रीणी कोच्ची गावानजीकच्या वर्धा नदीपात्रावर आंघोळीला गेल्या होत्या. स्वच्छ, वाहतं, सुंदर पाणी दिसल्याने त्यांना पोहण्याचा वा अंघोळीचा मोह आवरला नाही. प्रथम खुशी राऊत व प्राजांली राखुंडे या दोघी नदीच्या पाण्यात उतरल्या. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडू लागल्या. हे पाहून तिसरी सानिया बोडे हिने आरडाओरड केली व कोच्ची गावात येऊन लोकांना घटना कथन केली. त्यानंतर गावातील नागरिकांनी याबाबतची माहिती वडकीचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांना दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पोलिस जमादार रमेश आत्राम, अविनाश चिकराम, मडावी हे पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. मुली पाण्यात उतरल्या त्या ठिकाणची पाहणी करुन पोहने येणाऱ्या काही लोकांना सोबत घेऊन सदर मुलींना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. त्या बुडालेल्या मुलींना बाहेर काढले व तातडीने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे नेत असताना वाटेतच दोघींचाही मृत्यु झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सदर मुलींचे मृतदेह शवविच्छेदनाकरीता ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे पाठविण्यात आले.