

यवतमाळ : जिल्ह्यात विविध भागात विजेच्या कडकडाटासह तुरळक पाऊस कोसळला. यामध्ये वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जखमी झाले. या घटना यवतमाळ, मारेगाव आणि वणी तालुक्यात बुधवारी (दि.६) घडल्या.
यवतमाळ तालुक्यातील येळाबारा येथील श्रावण नागोराव टेकाम हे नेहमीप्रमाणे शेळी चारायला जंगलात गेले होते. या दरम्यान वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा येथील अनिल रमेश फरताडे हेही नेहमीप्रमाणे पांढरकवडा शिवारातील शेतात कामे करीत होते. यावेळी तुरळक पावसासह विजेचा कडकडाट झाला. यावेळी अनिल यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. वणी तालुक्यातील तेजापूर येथील धर्मरत्न सुधाकर भगत (वय २५) यांचाही अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला तर पूनम संजय मालेकर (वय २२), गजानन दिवाकर कोंडेकर (वय २१) हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमीना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.