

Washim Hotels Open Food Sale
वाशीम : एकीकडे तुकाराम मुंडे यांच्या सारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने अन्न व खाद्य पद्धार्थ विक्री व ठेवण्या संदर्भात नवीन नियमावली जाहीर केल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची कडक अंमलबजावणी केली जात आहे. तर दुसरीकडे वाशीम शहरातील अनेक हॉटेल, नाश्ता केंद्रे आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये अन्नसुरक्षेच्या नियमांना हरताळ फासल्याचे चित्र दिसून येत आहे.
अनेक ठिकाणी भजी, समोसे, मिठाई, फरसाण व इतर खाद्यपदार्थ कोणतेही संरक्षणात्मक आवरण न ठेवता उघड्यावर विक्रीस ठेवले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उघड्यावर ठेवलेल्या अन्नपदार्थांवर धूळ, माश्या आणि इतर दूषित घटक सहज बसत असल्याने अन्न दूषित होण्याचा धोका वाढतो. अशा अन्नाच्या सेवनामुळे पोटाचे विकार, अन्नातून होणारे संसर्ग आणि इतर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अन्न व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा मानकांचे पालन करणे बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. संबंधित प्रशासन व अन्न व औषध प्रशासनाने (FDA) शहरातील हॉटेल व खाद्य विक्रेत्यांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.