वर्धा : शेतकरी महिला निधी लिमिटेडमध्ये आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्यात आली. मात्र मुदत संपूनही ग्राहकांना ठेवींचा परतावा दिल्या गेला नाही. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून अध्यक्ष व व्यवस्थापकाला पोलिसांनी गुरूवारी (दि.२७) ताब्यात घेतले.
सन २०१८ पासून शेतकरी महिला निधी लिमिटेडमध्ये गुंतवणूकदारांना दाम दुपट्टीने व जास्त व्याज देण्याचे आमिष दाखविले. मुदत संपल्यावर परतावा मिळणे अपेक्षित असताना ग्राहकांना ठेवी परत मिळाल्या नाही. सेलू येथील खातेदारानेदेखील २४ लाख ९७ हजार ४२० रुपये गुंतविले होते. परंतु रक्कम परत मिळाली नसल्याने त्यांनी सेलू पोलिसात धाव घेतली. सेलू पोलिसांत याबाबत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी अध्यक्ष शरद अरुण कांबळे आणि मनोज भाऊराव चौकोने या दोघांना अटक केली.
याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी महिला निधी लिमिटेडचे अंदाजे ७ हजार ग्राहक वर्धा आणि अमरावती या दोन जिल्ह्यात असल्याची माहिती पुढे येते. प्राथमिक तपासानुसार ३९ कोटी रुपये अडकले असल्याचा अंदाज आहे. यामध्ये गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले.