

वर्धा : नागरिकांना स्वच्छतेच्या बाबींची सवय अंगीकृत करण्याच्या दृष्टीने स्वच्छ माझे अंगण अभियान राबविण्यासाठी सुरुवात झाली आहे. १ ते २५ सप्टेंबर या कालावधीमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये स्वच्छतेबाबत कुटुंब स्तरावर सर्व बाबींचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन करणार्या कुटुंबाचा ग्रामपंचायतीकडून गौरव करण्यात येणार आहे. या अभियानाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान व पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जाधव यांनी केले आहे.
या अभियानाची अंमलबजावणी करताना स्वच्छ भारत मिशन टप्पा २ अंतर्गत वैयक्तिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन राबवित असलेल्या, जिल्ह्यातील सर्व कुटुंब स्तरावर या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन, नित्य नियमाने स्वच्छतेच्या बाबींची सवय अंगीकृत करण्यासाठी, जे कुटुंब वैयक्तिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापनाकरिता शोषखड्डा, परसबाग, बाजारखड्डा तसेच घनकचरा व्यवस्थापनाकरिता कंपोस्ट खतखड्डा, अथवा घरगुती खतखड्डा, आणि कुटुंब स्तरावर कचराकुंड्या याबाबतची उपलब्धता करून घेतली असून, त्यांचा नियमितपणे वापर करतात अशा कुटुंबांना प्रोत्साहन देणे, आणि त्यांचे अनुकरण करण्यासाठी इतर ग्रामस्थांना, कुटुंबधारकांना त्यांच्याप्रमाणेच वैयक्तिक स्वरूपाच्या स्वच्छतेच्या सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्यासाठी उद्युक्त करणे, या बाबींवर सदर अभियानामध्ये भर देण्यात येणार आहे.
स्वच्छतेबाबत कुटुंब स्तरावर प्रत्येक घटकांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी गावातील सर्व कुटुंबांमध्ये स्वच्छ माझे अंगण अभियान राबविण्याबाबत शासनाच्या वतीने निर्देश देण्यात आले असून, उत्कृष्ट व्यवस्थापन करणार्या कुटुंबांना २ ऑक्टोबरला म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी होणार्या ग्रामसभेमध्ये प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात यावे, असे शासन स्तरावरून निर्देश आहेत. त्या अनुषंगाने सर्व ग्रामपंचायतींना सूचना देण्याकरिता गटविकास अधिकारी यांना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने निर्देश देण्यात आलेले आहेत, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने देण्यात आली.