नागपूर : पुढारी वृत्तसेवा
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 मते फुटल्याचे उघडकीस आले आहे. यानंतर आता हे आमदार कोण, हे पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आले असून, संबंधितांवर 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबन कारवाई अटळ आहे. या विषयीचा अहवाल हायकमांडकडे गेल्याचे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यास दुजोरा दिला. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील माध्यमांशी बोलताना रविवारी यासंदर्भात संकेत दिले. गेले अनेक महिने काँग्रेसच्या यादीत कागदोपत्री असलेले हे आमदार मनाने सत्तापक्षकडेच असल्याचे कळते. आगामी विधानसभा निवडणुकीत ते महायुतीचे उमेदवार असतील असेही बोलले जाते. या पार्श्वभूमीवर लवकरच काँग्रेसमधून या आमदारांच्या निलंबनाची कारवाई अटळ असल्याचे सांगितले जाते.
गेल्या विधान परिषद निवडणुकीतच या आमदारांनी पक्षाशी बेईमानी केली, मात्र कारवाई झाली नाही. यावेळी हे आमदार कोण, याचा शोध घेण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतल्याने त्यांचा शोध लागला. या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या विधान परिषद निवडणुकीची पुनरावृत्ती झाली आहे. गेल्या वेळी काँग्रेस हायकमांडने दिलेले उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांच्या विरोधात मतदान केल्याने त्यांचा पराभव झाला तेच हे सात आमदार यावेळी देखील महाविकास आघाडीच्या विरोधात गेले आहेत.
यामुळे आता तरी तातडीने या सर्वांवर ठोस कारवाई पक्षाने करावी अशी मागणी या निमित्ताने काँग्रेस आमदारांकडून पुढे आली आहे. दरम्यान, ज्या आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार आहे, त्यामधील काहींनी उगाचच आमच्यावर बोट दाखवू नका, आम्हाला दोषी धरू नका, आम्ही पक्षविरोधी काम केलेले नाही, मतपत्रिका तपासून पहा इतरांचे खापर आमच्यावर फोडू नका, अशीही भूमिका घेतल्याने पक्षाने देखील आता सावधपणे पुढे जाण्याचे ठरविले आहे.
निवडणुकीपूर्वी चार ते सात आमदार फुटणार असे उघडपणे बोलणारे आमदार, पक्षविरोधी भूमिका घेणारे आमदार आणि आम्ही काही केलेच नाही अशा अविर्भावात राहणारे आमदार यापैकी नक्की कोण दोषी याचाही शोध आता हाय कमांडणे घेणे सुरू केले आहे. अर्थातच प्रदेश काँग्रेसने या संदर्भातील आपला अहवाल हाय कमांडकडे सोपविला आहे. असे असले तरी कारवाई मात्र दिल्लीतूनच होणार आहे. अर्थातच ती कधी होणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.