पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात सर्वत्र चांगल्या पावसाने हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र अन् घाट माथ्यावर अतिवृष्टी सुरू आहे. या भागाला १५ व १६ जुलै रोजी रेड, तर विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात सर्वदूर मुसळधार ते मध्यम पाऊस सुरू झाला असून १८ जुलैपर्यंत तो सुरू राहणार आहे.
• सर्वाधिक पाऊस ताम्हिणी घाटावर ३१५ मि.मी.
• राज्यात सर्वत्र मुसळधार ते मध्यम पावसाला सुरुवात
• घाटमाथ्यावर पर्यटनाला जाताना सावधानतेचा इशारा
शनिवारपासून राज्यातील सर्वच भागांत पावसाने बहार आणली. सर्वत्र मुसळधार ते मध्यम पावसाला सुरुवात झाली असून, १८ जुलैपर्यंत पावसाचा रोज कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. घाटमाथ्यावर पर्यटनाला जाताना सावधानतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्या भागात दरड कोसळणे, रस्ते खचणे, कच्ची घरे पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) आज (दि.१५ जुलै) संपूर्ण राज्यभरात पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा आणि यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट. मुंबई, ठाणे, पालघर आणि धुळे येथे आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रेड अलर्ट : कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथा (१५ व १६ जुलै)
ऑरेंज अलर्ट : विदर्भ १५ व १६ जुलै मराठवाडा
उत्तर महाराष्ट्र : येलो अलर्ट (१५ व १६ जुलै)