

The Sarsanghchalak guided the youth generation at an ABVP event
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
आज अभाविप असो की इतरही संघटनांची दशा बदलली. अनुकूलता, सुविधा आहेत पण कुणीही स्वतःला मालक समजू नये. उपलब्ध साधनांचा उपयोग अधिकाधिक चांगल्या कार्यासाठी व्हावा हाच धर्म आहे. ज्ञान आणि कर्म दोघांचाही समन्वय हवा. ज्ञान,कर्म आणि भक्ति या त्रिवेणी संगमातून लोकशक्ती वाढते. देशसेवा, देशभक्ती आमच्यासाठी सर्वोच्च स्थानी आहेत या शब्दात सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी आज कान टोचले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गुणांचे अनुकरण करा, याच पद्धतीचा संदेश समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती संभाजी महाराज यांना एका पत्रातून दिला होता याकडे सरसंघचालकांनी आवर्जून लक्ष वेधले. आज सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या विधानाला महत्व आले आहे.
सुरेश भट सभागृहात आज शनिवारी सायंकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे यशवंतराव केळकर स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित 'प्रिय यशवंतराव... अभिवाचन' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय संघटनमंत्री आशिष चव्हाण, प्रदेश अध्यक्ष डॉ श्रीकांत पर्वत, राष्ट्रीय मंत्री पायल कीनाके, प्रदेश मंत्री देवाशीष गोतरकर तर उपस्थितांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कुलगुरू श्रीराम कावळे, नितीन पाटील, देवदत्त जोशी, नीलेश सोळंकी प्रामुख्याने उपस्थित होते.
यशवंतराव केळकर यांचे जीवन चिंतन अभाविप कार्यकर्त्यांसाठी प्रबोधनपर, वस्तुपाठ आहे. आद्य सरसंघचालक डॉ हेडगेवार यांनी दिलेली कार्यपद्धती आजही समर्पक असून मनुष्य आहे तोवर ती अविनाशी आणि शाश्वत जीवनाचे सत्य असल्याचे विरोधकांना ठणकावून सांगितले. जसे यशवंतराव केळकर होते तसेच नव्या पिढीसाठी आपल्याला रोल मॉडेल व्हायचे आहे. विशिष्ट प्रकारचे जीवन घडविणे, मनुष्यनिर्मितीचे संघाचे ध्येय असून स्वतः मजबूत बना, इतराना बनवा ही शक्ती संघटनेतून मिळते. फळाची अपेक्षा सोडून निर्दोष प्रयत्न करणे हेच संघाच्या 100 वर्षाचे गमक असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
अभिवाचन लेखक, दिग्दर्शक मिलिंद भांगे आणि सहकाऱ्यांचा सरसंघचालकांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 70 लाख अभाविप कार्यकर्त्यांचे हे संघटन देशविदेशात युवक, विद्यार्थांच्या प्रश्नासाठी संघर्ष करीत असल्याचे राष्ट्रीय संघटनमंत्री आशिष चव्हाण यांनी सांगितले.