

नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आज गुरुवारी नागपुरात उत्साहात स्वागत झाले. माजी उपमुख्यमंत्री अजितदादादा पवार यांच्या निधनानंतर त्या प्रथमच आल्या आहेत. शासकीय निवासस्थान 'विजयगड' येथे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. विमानतळावर आगमन होताच शहराध्यक्ष अनिल अहिरकर, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, शहराचे कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी सुनेत्राताईंचे प्रथम पुष्पगुच्छ देऊन उत्साही स्वागत केले.
विमानतळावरील स्वागतानंतर ना. सुनेत्राताई पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी त्यांनी विदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा केली आणि कार्यकर्त्यांच्या सूचना व समस्यांची निवेदने व्यक्तिशः स्वीकारली. "सामान्यांचे प्रश्न सोडवणे आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच आमची प्राथमिकता आहे," असे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले. त्यांच्या या आश्वासक भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.
नगरसेविका सौ आभा पांडे, बजरंगसिंह परिहार, तानाजी वनवे, जानबा मस्के, सुनीता येरणे, विशाल खांडेकर, दिलीप पनकुले आदी पक्षाचे विविध सेलचे अध्यक्ष, महिला आघाडी, युवक आघाडीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
पवार विरुद्ध पवार नाहीच !
खासदार सुप्रिया सुळे यांनी पवार विरोधात पवार कुणीही लढणार नाही या जाहीर केलेल्या भूमिकेचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी स्वागत केले.आम्ही नेहमीच कुटुंब,परिवार हा वेगळा विषय आणि राजकारण वेगळे ठेवले आहेत यावर माध्यमांशी बोलताना भर दिला. कडक उन्ह असताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले हेच दादांवरील प्रेम आहे. बारामतीच्या निवडणूक निकालाबाबत आजच बोलणे योग्य नाही. अनेकदा निकालाचा अंदाज खोटा ठरतो असे सांगत त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला.