

नागपूर: Chandrashekhar Bawankule | शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सरकार सोडवेल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग झाला पाहिजे. समृद्धी महामार्गासारखेच शक्तीपीठ महामार्गामुळे संपूर्ण विभागाचे चित्र बदलणार असल्याचे राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
कॅगच्या अहवालानुसार अडीच हजार कोटीपेक्षा जास्त दारू घोटाळा दिल्लीत केजरीवाल सरकारने केला आहे. कॅगच्या अहवालामध्ये ते आले आहे. चुकीच्या पद्धतीने दारूचे परवाने दिले, पैसे गोळा करण्यासाठी केजरीवाल सरकारने हा घोटाळा केला होता. वीस हजार कोटीच्या वर हा घोटाळा असून त्या संदर्भातील अहवालात पहिला घोटाळा समोर आला आहे. पुढील काळात अनेक घोटाळे समोर येतील असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, तलाठी असहकार आंदोलना विषयी त्यांनी सांगितले, ॲग्रीस्टॅगचे काम समन्वयाने करायचे आहे. ॲग्रीस्टॅगमध्ये प्रत्येक शेतकऱ्याची माहिती नोंदवली जाऊन त्यांना एक बारकोड मिळणार आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना ऑनलाईन मिळणार आहे. ॲग्रीस्टेक कार्डवर संपूर्ण माहिती असणार आहे. हा महत्वाचा उपक्रम आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव असला तरी ते त्यांचे ( तलाठी) काम आहे, त्यांना करावेच लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे कार्ड असून सर्व योजना त्यातून देता येईल असेही बावनकुळे यांनी सांगितले.