

Maharashtra Unopposed Municipal Elections
नागपूर: राज्यात अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे नातेवाईक त्यात बायको, वहिनी, मामे भाऊ, दीर, बहिण, मुलगा बिनविरोध निवडणूक जिंकून आले. अनेक ठिकाणी गुलाल उधळला गेला आणि लोकशाही पायदळी तुडवण्यात आली आहे. सत्तेच्या बळावर दबाव टाकून निवडणुका बिनविरोध करून सत्ताधारी पाठ थोपटून घेत असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज (दि.२२) माध्यमांशी बोलताना केली.
वडेट्टीवार म्हणाले की, सत्ता महायुतीची असल्याने संपूर्ण यंत्रणा वापरली जात आहे. कुठे पैशाचे प्रलोभन दाखवून कुठे पोलिस बळ वापरून निवडणुका बिनविरोध केलेल्या आहेत. दादागिरी, गुंडगिरी करून सत्ताधाऱ्यांचे नातेवाईक बिनविरोध निवडून आले आहेत .त्यामुळे जिथे निवडणुका होतील, तिथे निवडणुका पारदर्शक होतील का? असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. एके ठिकाणी तर भाजपची महिला उमेदवार थेट सांगत आहे. मतदान करा नाहीतर, गाठ माझ्याशी आहे, निधी देणार नाही, विकास होणार नाही, मुख्यमंत्री भाजपचा असल्याने पदाधिकाऱ्यांना पण जोर चढला आहे. जनताच आता याबाबत काय ते ठरवेल, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
आमदारांना देण्यासही सरकारकडे पैसे नाही
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटदारांनी पुन्हा एकदा काम बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. सरकार शेतकऱ्यांना पैसे देत नाही, कंत्राटदारांची एक लाख कोटीची बिल थकवली आहेत. त्यांना पैसे देत नाही पण निवडणुका आल्या म्हणून आपल्या आमदाराना द्यायला सरकारकडे पैसे आहेत. राज्य तर दिवाळखोरीकडे निघाले आहे. पण सरकारची पण अकलेची दिवाळखोरी जास्त झाली आहे, अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.
निवडणुका आल्या की भाजपचे सर्व्हे येतात, बहुमत मिळणार अशा बातम्या येतात. हे सर्व्हे भाजपच करते, बातम्या पण भाजपच देते.लोकांना मूर्ख बनवण्याचे हे भाजपचे उद्योग आहेत. मुंबईत आता मतदार आयडी सापडले आहेत, जसे महाराष्ट्र आणि बिहारमध्ये केले, तशाच पद्धतीने मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकायची असेल.बॅलेटवर निवडणुका झाल्या की दूध का दूध खरे होईल ,खरे जनमत स्पष्ट होईल असेही वडेट्टीवार म्हणाले.