

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray
नागपूर : महाराष्ट्रात ‘ब्रँड’ म्हणून जर कोणी असेल तर तो एकच आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. इतर कोणीही स्वतःला ब्रँड समजणे अयोग्य आहे. कोणीही स्वतःला ब्रँड समजू नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला आणि आमच्या महायुतीला अभूतपूर्व असा कौल मिळालेला आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने दाखवलेला हा विश्वास आहे. भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष ठरला. यापूर्वी महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाला इतका कौल मिळालेला नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. विजयाचे श्रेय महाराष्ट्रातील जनतेला आहे. हे यश आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, मी नागपूरचा आहे. नागपुरातही आम्हाला चांगले यश मिळाले.मात्र, या यशानंतर आम्ही कोणत्याही प्रकारच्या अति आत्मविश्वासात जाणार नाही. लोकांनी दिलेली ही जबाबदारी आहे. ती जबाबदारी पारदर्शक कारभारातून योग्य पद्धतीने पूर्ण करू, असा विश्वास मी राज्यातील मतदारांना देतो.दरम्यान, पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जिंकण्याचा आनंद नक्कीच व्यक्त केला पाहिजे, पण तो आनंद कोणाला दुखावेल अशा पद्धतीने साजरा करू नये. ठाकरे आणि राणे हा एक इतिहास आहे. भाजपच्या नेत्यांनी आजच्या विजयानंतर कोणीही मर्यादा ओलांडू नये. आनंद जरूर व्यक्त करा , पण उन्माद दाखवू नका, या शब्दात नितेश राणे यांचा ठाकरेंना डिवचवणारा व्हिडिओ यावर नाराजी व्यक्त केली.
२६ ते २७ महानगरपालिकांमध्ये आम्ही सत्तेत येऊ, असे मी यापूर्वीच सांगितले होते. त्यापैकी २५ ठिकाणी आम्ही जिंकत आहोत. आणखी एका ठिकाणी आम्ही निवडून येऊ.
बाळासाहेबांच्या विचारांशी जर प्रतारणा केली नसती, तर ठाकरेंची ही अवस्था झाली नसती.विरोधी पक्षाने ज्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे होते, ते या निवडणुकीत मला दिसले नाहीत. विरोधी पक्षात असताना मेहनतीने पक्ष उभा करावा लागतो, ती मेहनत मला विरोधकांकडे दिसली नाही. निवडणुकीत काय टिका केली त्याला आता काही महत्त्व देणे आवश्यक नाही असे अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देताना स्पष्ट केले. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील यश हे छप्पर फाड के यश आहे असे सांगितले.