

NEET Exam Centre: NEET पुनर्परीक्षेच्या अवघ्या काही तास आधी राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पेपरफुटी आणि परीक्षेतील गैरव्यवहारांच्या आरोपांनंतर आता परीक्षा केंद्र वाटपातील कथित निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे.
नागपूरमधील अब्दुल्ला मोहम्मद या विद्यार्थ्याला 21 जून रोजी होणाऱ्या NEET पुनर्परीक्षेसाठी थेट अबुधाबी (UAE) येथील परीक्षा केंद्र देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्याने अर्ज भरताना नागपूर, वर्धा आणि भंडारा ही केंद्रे प्राधान्यक्रमाने निवडली होती. तरीही त्याला हजारो किलोमीटर दूर असलेल्या परदेशातील केंद्राचे प्रवेशपत्र मिळाले.
या प्रकारामुळे विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबीयांची चांगलीच धावपळ उडाली आहे. अब्दुल्लाने सांगितले की, त्याच्याकडे पासपोर्टसुद्धा नाही. अशा परिस्थितीत अवघ्या एक-दोन दिवसांत व्हिसा आणि प्रवासाची तयारी करून अबुधाबीला जाणे अशक्य आहे.
दरम्यान, NEET पुनर्परीक्षेला फक्त एक दिवस शिल्लक असताना ही चूक समोर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये चिंता वाढली आहे. यापूर्वी झालेल्या परीक्षेसाठी अब्दुल्लाला नागपूरमधील केंद्र मिळाले होते. त्यामुळे अचानक परदेशातील केंद्र कसे देण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणी विद्यार्थ्याने NTA च्या हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली. प्राथमिक चर्चेदरम्यान ही तांत्रिक चूक असल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केल्याची माहिती मिळाली आहे. तसेच सुधारित प्रवेशपत्र देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते डॉ. अनीस अहमद यांनीही या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी NTA च्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विद्यार्थ्याला तातडीने योग्य परीक्षा केंद्र देण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, NTA शी संपर्क साधल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला नागपूरमधील केंद्र देण्यात येईल आणि नवीन प्रवेशपत्र दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, अंतिम प्रवेशपत्र हाती येईपर्यंत विद्यार्थी आणि त्याचे कुटुंबीय तणावाखाली असल्याचे दिसून येत आहे.