नागपूर : जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सुरगाव येथे होणाऱ्या कत्तलखान्याच्या आदेशाला स्थगिती मिळावी. कोर्टाचा आदेशाने हा बदल होत असल्याने आम्ही न्यायालयीन लढाई लढू. हा कत्तलखाना येथे झाला तर सर्वात पहिला बळी माझा असेल, असा इशारा सोमवारी (दि.२५) वारकरी संप्रदायाचे ओमदेव महाराज चौधरी यांनी दिला.
येत्या १५ दिवसात सकारात्मक निर्णय न आल्यास विदर्भात तीव्र आंदोलनाचा इशारा वारकरी संप्रदायाकडून देण्यात आला. या परिसरातच नाही तर संपूर्ण विदर्भात कुठेही हा कत्तलखाना होऊ नये, अशी मागणीही वारकरी संप्रदायाचे ओमदेव महाराज यांनी केली.
पवनगाव येथे होणारा कत्तलखाना कोर्टाच्या आदेशानंतर उमरेड रोडवरील सुरगाव येथे होत आहे. याला वारकरी संप्रदायाकडून तीव्र विरोध करण्यात आला. या अनुषंगाने सोमवारी (दि.२५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी आमदार राजू पारवे यांनी भेट घेतली. तसेच सुप्रीम कोर्टात या विरोधात वकील लावून सर्व संघटनेच्या माध्यमातून तो कत्तलखाना येथे होणार नाही, यासाठी कोर्टात बाजू मांडू असेही माजी आमदार राजु पारवे यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.