![नाना पटोले](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F02%2FUntitled-design-2023-02-07T120303.917.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर;पुढारी ऑनलाईन: मोफत धान्य घोषणा निवडणूक समोर असल्याने झाली. स्वतः पंतप्रधान सांगतात की, देशात गरिबी नाही. मग 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची घोषणा का केली? त्यातही रेशनमध्ये सर्वच धान्य मिळत नाही, हा एक जुमलाच आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
गुजरातचे ड्रग्ज महाराष्ट्रात आणण्याचे काम या सरकारने केले आहे. हे सरकार राज्याला ड्रग्जच्या विळख्यात आणण्याचे काम करीत आहे. ललित पाटीलच्या माध्यमातून यापूर्वी हे सत्य पुढे आले आहे, असा आरोप पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केला. पंतप्रधान मध्यप्रदेश, छत्तीसगड दौऱ्यावर आले आहेत. छत्तीसगढमध्ये भाजपने जाहीरनामा काढला, गॅस सिलेंडर 500 रुपयात देण्याचे सांगितले. पंतप्रधान हे देशाचे आहेत. मग आता देशभरातील जनतेला ते सवलतीत द्यायला पाहिजे. धान आधारभूत किंमत वाढवण्याचे सांगतात, महागाई कितीही केली तरी लपवता येत नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष राज्यात फिरत आहेत, तेव्हा याचा अनुभव त्यांनाही आला आहे, असेही पटोले यांनी म्हटले आहे.
आमदार अपात्रता सुनावणी संदर्भात बोलताना ,शेड्युल 10 प्रमाणे जे अधिकार आहेत, ते स्पीकरचे आहे. ज्या त्रुटी असतील, त्या त्रुटी दूर करून मुख्य न्यायाधीश निर्णय घेऊ शकतात. विधिमंडळाला संविधानानुसार अधिकार मिळाले आहेत. लगाम लावण्याचे काम न्यायालयाचे असते. विधिमंडळाने घटनेच्या चाकोरीत राहून काम करायचे आहे. मर्यादेच्या कालावधीत राहून निर्णय घ्यायला पाहिजे असेही माजी विधानसभा अध्यक्ष पटोले यांनी स्पष्ट केले. मागासवर्ग आयोग नेमून ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात सवलती देण्याच्या सूचना मी फार पूर्वी दिल्या होत्या. जातनिहाय जनगणना महत्वाची गोष्ट आहे.
केंद्र सरकारने ती जनगणना थांबवून ठेवली आहे. 50 टक्क्यांची मर्यादा काढल्याशिवाय आरक्षण अडचणी सुटू शकत नाहीत. दरम्यान,अजित पवार आईच्या भूमिकेवर बोलताना प्रत्येक आईला वाटते आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावा, त्यात चूक नाही असे पटोले म्हणाले.