

नागपूर : जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीतील कमकुवत वीजयंत्रणा आणि बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाचा फटका अखेर प्रशासनाला बसला आहे. शुक्रवारी (१२ जून) वीजपुरवठ्याचा दाब अचानक वाढल्याने विविध विभागांतील एसी, संगणक, प्रिंटर आणि अन्य विद्युत उपकरणे निकामी झाली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी बांधकाम विभागाने नुकसानीची नेमकी आकडेवारी जाहीर केलेली नाही.
मागील महिनाभरात जिल्हा परिषदेच्या इमारतीत चार ते पाच वेळा वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या होत्या. जुन्या इमारतीतील वीजवाहिन्यांचे जाळे कालबाह्य आणि कमकुवत झाल्याने इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याची मागणी वारंवार होत होती. पावसाळ्यापूर्वी वीजयंत्रणेची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती आणि नवीन वीजवाहिन्या टाकण्याची जबाबदारी बांधकाम विभागावर असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.
शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयातील काही कामांदरम्यान जिल्हा परिषदेला वीजपुरवठा करणारी वाहिनी क्षतिग्रस्त झाली. त्यानंतर अचानक वीजदाब वाढल्याने अनेक विभागांतील एसी, कूलर, संगणक आणि प्रिंटर बंद पडले. काही ठिकाणी उपकरणे पूर्णपणे निकामी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा परिणाम केवळ कार्यालयीन कामकाजावरच नाही, तर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवरही झाला. वीजपुरवठ्यातील बिघाडामुळे लिफ्ट बंद पडली आणि त्यामध्ये काही कर्मचारी अडकून पडल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विशेष म्हणजे, या घटनेत नेमके किती नुकसान झाले, कोणत्या विभागातील किती उपकरणे निकामी झाली, याची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. बांधकाम विभागाने या संपूर्ण प्रकरणावर गुप्तता बाळगल्याने संशय अधिकच वाढला आहे. दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वीजयंत्रणेची स्थिती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात आणखी मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.