

Vijay Wadettiwar on OBC reservation
नागपूर: सत्ताधाऱ्यांचे मांडलिकत्व स्वीकारणारे कधीही ओबीसी समाजाचे नेते किंवा हित साधू शकत नाहीत. ते ओबीसींवर अन्याय करीत असतील तर जनताच योग्य निर्णय घेईल, असा थेट हल्ला काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ओबीसी महासंघाशिवाय विविध इतर ओबीसी संघटनांची एकत्रित बैठक आज (दि.६) रविभवन येथे झाली. यावेळी बहुतांशी काँग्रेस नेते पदाधिकारी उपस्थित होते.
यावरून ओबीसी महासंघाच्या आंदोलनात भाजप नेते तर इकडे काँग्रेस नेते असे राजकीयदृष्ट्या ध्रुवीकरण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या संदर्भात छेडले असता वडेट्टीवार यांनी या शब्दांत तीव्र संताप व्यक्त केला. 30 जणांची कोअर कमिटी स्थापन केली जात असून ती आंदोलनात्मक पुढील निर्णय घेईल, असेही स्पष्ट केले. मराठा समाजाशी संबंधित जीआरमुळे ओबीसी समाजात संताप आहे. सरकारने एकाच दिवशी दोन जीआर काढले. एकात पात्र शब्द होता, तर दुसऱ्यात तो काढण्यात आल्याने सरकारच्या हेतूविषयी शंका निर्माण होते.
12 सप्टेंबर रोजी पुढील बैठक होणार असून यात पुढील रणनीती ठरविली जाईल. ऑक्टोबरमध्ये नागपुरात ओबीसींचा एक भव्य मोर्चा काढला जाणार आहे. यासंदर्भात तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. ओबीसींच्या हिताला बाधा नसल्याचे कुणी सांगत असतील तर ती सत्ताधाऱ्यांची भूमिका असू शकते, असे सांगत एकप्रकारे ओबीसी महासंघालाही कोंडीत पकडले. ओबीसी महासंघाने सरकारने 12 मागण्या मान्य केल्याचे सांगत उपोषणाची सांगता केली. याकडे लक्ष वेधले असता वडेट्टीवार बोलत होते.
आजच्या बैठकीत विदर्भातील सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी आणि विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. जीआर संदर्भात नाराजी व्यक्त झाली. पात्र शब्द काढून टाकल्याने सरकट असाच त्याचा अर्थ होत असल्याने ओबीसी समाज आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. ओबीसींच्या संवैधानिक हक्कासाठी रस्त्यावर तसेच न्यायालयीन लढाई आम्ही लढणार आहोत. वकिलांची संघटना याकामी लागलेली असून आमचे त्यांना समर्थन असेल. या बैठकीत आमदार अभिजीत वंजारी, माजी खासदार खुशाल बोपचे, शेखर सावरबांधे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.