नागपूर : नागपुरातील दीक्षाभूमी परिसरात सुरू असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगचा मुद्दा सोमवारी चिघळला आणि शेकडो तरुण-तरुणींसह आंबेडकरी अनुयायांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी तोडफोड करीत या बांधकामाला विरोध केला.
या घटनेनंतर दीक्षाभूमी परिसरात प्रचंड पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या घटनेचे संतप्त पडसाद नागपूरबरोबरच मुंबईमध्ये विधिमंडळ परिसरात उमटले. अधिवेशन सुरू असल्याने सत्तारूढ आणि विरोधक अशा दोघांनी याबाबतीत आपापली मते व्यक्त केली. विरोधकांनी लोकभावना लक्षात घेता काम थांबवावे, असे सांगत सरकारला लक्ष्य केले.
अखेर सरकारने या बांधकामाला स्थगिती दिल्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तातडीने केलेल्या निवेदनातून जाहीर केला. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, स्मारक समितीनुसारच विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये दिले. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. लवकरच याबाबत एक बैठक घेऊन संमतीने निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, सायंकाळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दीक्षाभूमी परिसराला भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच निर्णय घेतला असता, तर दीक्षाभूमीतील पार्किंगचा वाद चिघळला नसता, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. आताही त्यांनी केवळ कामाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पार्किंगचे काम पुन्हा सुरू होणार नाही, याबाबतचे ठोस आश्वासन मिळाले पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आपण बोलणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. जनभावनेचा विचार न करता कारभार करणार्या विश्वस्तांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.