

Vijay Wadettiwar on BJP
नागपूर : मोदी सरकारने उज्ज्वला योजनेचा मोठा गाजावाजा केला, पण आज वाढत्या गॅस दरांनी गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांचे कंबरडे मोडले आहे. ज्या महिलांना धुरापासून मुक्तीचे स्वप्न दाखवले गेले, त्याच महिलांना आज पुन्हा चुलीच्या धुरात जीवन जगण्याची वेळ आली आहे, असा आरोप काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी (दि.९) केला.
एकेकाळी १२ अनुदानित सिलिंडर देण्याची घोषणा करणारे सरकार आज तेच लाभ कमी करत करत केवळ ४ सिलिंडरपर्यंत घेऊन आले आहे. महागाईने त्रस्त असलेल्या कुटुंबांना हजार रुपयांच्या आसपास पोहोचलेल्या सिलिंडरची किंमत परवडेनाशी झाली आहे.
उज्ज्वला योजनेची जाहिरात करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च झाले, पण गरीब महिलांच्या घरात गॅस टिकवण्यासाठी आवश्यक धोरण मात्र तयार झाले नाही. परिणाम असा की, लाखो महिलाना पुन्हा लाकूड, कोळसा आणि चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.
१२ वर्षांच्या मोदी सरकारचा हा खरा चेहरा आहे. घोषणा मोठ्या, जाहिराती भव्य, पण सामान्य जनतेच्या आयुष्यात काडीचा फरक नाही. महिलांना धूरमुक्त जीवनाचे आश्वासन देणारे सरकार आज त्यांनाच पुन्हा धुराच्या विळख्यात ढकलत आहे,त्यामुळे मोदी सरकारची ही योजना म्हणजे एक जुमला ठरली! वाह मोदी जी वाह...अशा शब्दात वडेट्टीवार यांनी टीकास्त्र सोडले.