

Vidarbha Irrigation Projects
नागपूर : केवळ सिंचनाच्या सुविधा उभारणे पुरेसे नाही, तर त्या पाण्याचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कसा लाभ होईल यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. यासाठी ‘इंटिग्रेटेड’ (समग्र) अभ्यासावर आधारित नियोजनाची गरज अधोरेखित कोणतेही काम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे याचा विचार करा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत कार्यरत पाणी वापर संस्था, लाभार्थी शेतकरी तसेच सिंचन, कृषी विभाग आणि नाबार्डच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेताना पाण्याच्या प्रभावी वापरातून शेती उत्पादन वाढवणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीस गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता गवळी, पाटील, जलसंधारण विभाग नागपूरचे अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता अनंत जगताप, साखरकर, जनकल्याणकारी समिती नागपूरचे अध्यक्ष सुमंत पुणतांबेकर, पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी मिलिंद जोशी आणि राजेंद्र देशकर उपस्थित होते.
गडकरी पुढे म्हणाले, केवळ सिंचनाच्या सुविधा उभारणे पुरेसे नाही, तर त्या पाण्याचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कसा लाभ होईल यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. “उत्पादन आणि उत्पादकता वाढणे, सिंचन झालेल्या भागात रोजगारनिर्मिती होणे, छोटे उद्योग उभे राहणे आणि त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळणे, या सर्वांचा एकत्रित विचार करूनच नियोजन झाले पाहिजे.
विदर्भात पावसावर अवलंबून असलेली शेती मोठ्या प्रमाणावर आहे. अनियमित पावसामुळे उत्पादनात चढ-उतार होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अनिश्चिततेला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत गोसे खुर्दसारखे मोठे सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरत आहेत. नियोजनबद्ध पाणीपुरवठा झाल्यास केवळ पिकांचे उत्पादनच वाढत नाही, तर पीक विविधीकरण, दुहेरी पिकपद्धती आणि प्रक्रिया उद्योगांना चालना मिळू शकते. असा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रास्ताविक मिलिंद जोशी यांनी केले.