

नागपूर : "राज्य सरकार हे लबाडांचे आणि दुतोंडी सरकार असून, त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. या सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसी बांधवांवर मोठा अन्याय होत आहे. जर ओबीसींचे नुकसान होत असेल, तर आपल्याला लढावेच लागेल. आता रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही आणि लवकरच आम्ही या आंदोलनाची घोषणा करू," असा तीव्र इशारा काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते प्रचंड संतापले होते.
सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर तोफ डागताना वडेट्टीवार म्हणाले की, या 'डबल ढोलकी' सरकारने मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही समाजाच्या हातात शेवटी 'घंटा' देण्याचेच काम केले आहे. दोन्ही समाजाला परस्परांविरोधात उभे करून सरकारला स्वतःची सत्तेची खुर्ची मजबूत करायची आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.
एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, तर दुसरीकडे मराठा समाजाला वेगळीच आश्वासने देत आहेत. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले की सरकार लगेच तोडगा काढते. ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्याचे सांगून त्यांना प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली जाते. मग मूळ ओबीसींच्या हक्कांचे काय?, असा सवाल देखील वडेट्टीवार यांनी केला आहे.
ओबीसी समाजाने हे लक्षात ठेवावे की हे सरकार तुमच्या बाजूने अजिबात नाही. त्यामुळे आपल्या हक्कासाठी आता घराबाहेर पडावेच लागेल. सरकारच्या या भूमिकेमुळे ओबीसी समाजात तीव्र असंतोष पसरला असून, येत्या काही दिवसांत वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली मोठे राज्यव्यापी आंदोलन उभे राहण्याचे संकेत मिळत असल्याचे देखील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.