

नागपूर- देशातील जनता महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि आर्थिक अस्थिरतेने होरपळत असताना भाजप सरकार मात्र धार्मिक ध्रुवीकरण, इव्हेंटबाजी आणि भावनिक मुद्द्यांच्या आड आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहे. कोविडमध्ये लॉकडाऊन लागल्याने जसा देश ठप्प झाला होता तसा भविष्यात होऊ शकतो. असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
वाहनाचे आरसी बुक बघून डिझेल दिले जात आहे. शेतकरी आता शेतीच्या कामासाठी डिझेल वापरतात. देशातील स्थिती येत्या काही दिवसात लॉकडाऊन सारखी होऊ शकते. पुढील काही दिवसात पेट्रोल १७० रुपये आणि डिझेल १५० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मध्यमवर्गीय, शेतकरी आणि सामान्य नागरिक पूर्णपणे भरडले जातील. आताच विमानांच्या फेऱ्या कमी होत आहेत, इंधनाचा तुटवडा वाढत आहे. सरकारने देशाला आर्थिक खड्ड्यात ढकलण्याचे काम सुरू केले आहे,अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
मंत्री आपल्या शपथेचा विसर पडल्यासारखे असंवेदनशील विधान करत आहेत. जनतेचे लक्ष आर्थिक संकटावरून हटवण्यासाठी सरकार धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही सरकारवर निशाणा साधताना वडेट्टीवार म्हणाले, मनोज जरांगे पाटील सातत्याने आंदोलन करत आहेत, पण सरकार केवळ आश्वासनांची धूळफेक करत आहे. जीआर काढले जातात, मात्र अंमलबजावणी होत नाही. सरकारकडे जनतेला देण्यासाठी काहीही उरलेले नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.