

नागपूर : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अडकलेल्या नागपूर व परिसरातील १०६ भाविकांच्या सुरक्षित परतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने प्रशासनाने तातडीने समन्वय साधला. नेपाळपासून पटणापर्यंत भाविकांच्या सुरक्षित प्रवासाची व्यवस्था केल्यानंतर रेल्वेने महाराष्ट्राकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दरम्यान, यातील चार भाविकांनी विमानाने काठमांडूहून दिल्ली गाठून तेथून रेल्वेने नागपूरकडे प्रस्थान केले.
नेपाळमध्ये अडकलेल्या भाविकांच्या परतीसाठी आवश्यक समन्वय आणि मदत उपलब्ध करून देण्यात आली. १०६ भाविकांना पटणापर्यंत सुरक्षित आणल्यानंतर त्यांच्या महाराष्ट्रातील परतीसाठी रेल्वे प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. शनिवारी सकाळी ७.३६ वाजता रेल्वे क्रमांक १७६०९ने पटणाहून नागपूरच्या दिशेने सर्व भाविक सुखरूप रवाना झाले.
दरम्यान, नागपूर व आजूबाजूच्या परिसरातील चार भाविकांनी स्वतंत्रपणे विमानाने परतीचा प्रवास केला. इंदिरा चौधरी, सुलोचना खापरे, दीपक पांडे आणि वर्षा उपाध्याय हे चौघे शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या विमानाने काठमांडूहून दिल्लीला रवाना झाले. सायंकाळी ४ वाजता ते दिल्ली येथे पोहोचले. त्यानंतर रात्री ८ वाजता त्यांनी केरळ एक्स्प्रेसने नागपूरकडे प्रस्थान केले. हे चौघे शनिवारी नागपुरात पोहोचण्याची अपेक्षा आहे. संकटाच्या काळात प्रशासनाने तातडीने मदतीचा हात दिल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.