

Nagpur airport maintenance protest
नागपूर: एआय इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या (एआयईएसएल) नागपूर आणि इतर पाच केंद्रांवरील एअरक्राफ्ट टेक्निशियन्स आणि इंजिनीअर्सनी गेल्या तीन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे नागपुरात विमानांच्या देखभालीच्या कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिलीव्हिंग लेटर आणि नाहरकत प्रमाणपत्र न देण्यावरून हा वाद चिघळला. हर्ष चौरासिया, दिवाकर पांडे, अतनू सेन, शशी कुमार अशा नागपूर येथील चार एअरक्राफ्ट टेक्निशियन्ससह देशभरातील १८० जणांनी एआय इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडमधून राजीनामा दिला.
विहित नोटीस कालावधी पूर्ण करून आणि करारातील सर्व अटींचे पालन करूनही कंपनीने कोणतेही ठोस कारण न देता त्यांचे राजीनामे स्वीकारण्यास नकार दिला. यासंदर्भात उपमुख्य कामगार आयुक्त सुवाप्रियादर्शिनी मुथुपंडी यांनी ७ मे २०२६ रोजी कंपनीला पाठवलेल्या पत्रात कर्मचाऱ्याला राजीनामा देण्याचा घटनात्मक अधिकार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, प्रशांत कुमार आणि सुरज कुमार यांना नोकरीवरून काढण्यात आले. यानंतर कामगार संतापले. काम बंद केले. दरम्यान, व्यवस्थापन अकुशल कामगारांकडून काम करवून घेत असल्याचा आरोप केला जात आहे. आता एआईएसएलच्या मुख्यालय व्यवस्थापनाने यासंदर्भातील अहवाल मागवला आहे. एकीकडे वाढत्या विमान दुर्घटना लक्षात घेता अकुशल कामगारांकडून काम करवून घेणे हवाई प्रवाशांच्या जीवावर बेतणारे असल्याचे बोलले जाते.