नागपूर : पुढारी वृत्तसेवा
नागपुरातील पवित्र दीक्षाभूमी येथे आज (सोमवार) अंडरग्राउंड पार्किंगचा मुद्दा बराच तापला. विरोध करणाऱ्या शेकडो आंबेडकरी अनुयायांनी जाळपोळ व तोडफोड करीत या बांधकामाला विरोध केला. गेले काही दिवस स्मारक समितीत दोन गटात हा वाद कायम आहे. या घटनेनंतर परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बांधकामाला स्थगिती दिल्याचा निर्णय जाहीर केला.
या घटनेचे संतप्त पडसाद नागपूर सोबतच मुंबईत विधिमंडळ परिसरात उमटले. अधिवेशन सुरू असल्याने सत्तारूढ, विरोधकांनी याबाबतीत आपापली मते व्यक्त केली. विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले. अखेर राज्य सरकारने या बांधकामाला स्थगिती दिल्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तातडीने केलेल्या निवेदनातून जाहीर केला.
या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, स्मारक समितीनुसारच विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये दिले. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. मात्र लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लवकरच एक बैठक घेऊन संमतीने निर्णय घेण्यात येईल. सर्वांचे मत विचारूनच त्यावर निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.