

BJP West Bengal Victory Celebration
नागपूर : आज एक विलक्षण सुवर्णयोग जुळून आला आहे. संपूर्ण देश 'वंदे मातरम' या राष्ट्रभक्तीपर गीताचे १५० वे वर्ष साजरे करत असताना, याच गीताचे जनक महान साहित्यकार बंकिमचंद्र यांच्या बंगालमध्ये 'वंदे मातरम'चा खऱ्या अर्थाने उद्घोष करणाऱ्यांच्या हातात जनतेने सत्ता सोपवली आहे.
बंगालमधील ममताचा 'जंगलराज' आता संपुष्टात येत असून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तिथे एका कणखर राष्ट्रवादी प्रशासनाची स्थापना होत आहे, या शब्दांत भाजपचे महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी भाजपच्या विजयाचे स्वागत केले.
विदर्भ विभागीय कार्यालय धंतोली येथे भाजपने जल्लोष साजरा केला. यानिमित्ताने ते माध्यमांशी बोलत होते. तामिळनाडूमध्ये सनातन परंपरेचा अपमान करणाऱ्या व सत्तेचा वापर करणाऱ्यांना जनतेने सपशेल नाकारले आहे, तर आसाममध्ये विकासकामांवर विश्वास ठेवून जनतेने पुन्हा एकदा भाजपला कौल दिला आहे.
आम्ही जनतेने दिलेल्या या महान जनमताचा पूर्णतः सन्मान करतो. 'जनता जनार्दन' नेहमीच विकासाला आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देते. या निकालांवरून हे स्पष्ट झाले आहे.सामान्य नागरिक विकासाच्या राजकारणासोबत आणि राष्ट्रवादी विचारांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा असल्याचे दयाशंकर तिवारी यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकीपूर्वीच व्यक्त केलेला विजयाचा विश्वास आणि जनतेने हुकूमशाही नाकारत विकासाला कौल देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दाखविलेला विश्वास लक्षात घेता पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या देदीप्यमान यशाचा जल्लोष आज संघ मुख्यालयी नागपुरात जोरात साजरा होत आहे.
महाल परिसरात बडकस चौक, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दानी यांचे कार्यालय परिसरात भाजप,भाजयुमो कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.दुपारी तीननंतर या विजयानिमित्त महानगर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ कार्यालय, धंतोली, नागपूर येथे भव्य 'विजयोत्सव' आयोजित करण्यात आला आहे.