नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अमरावती रोडवरील धामणा शिवारात असलेल्या चामुंडा एक्सप्लोसिव्ह या बारूद गोळा फॅक्टरीत आज (दि.13) स्फोट झाला. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला, पाच जण गंभीर आहेत. मृतांमध्ये स्थानिक, नजीकच्या गावातील तरुणींचा समावेश आहे. हा नेमका स्फोट कसा झाला याविषयी तपास यंत्रणा कामाला लागली असून माजी गृहमंत्री आ अनिल देशमुख माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहचले.
या स्फोटामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर, पाच गंभीर आहेत. यामध्ये प्रांजली मोदरे (वय 22), प्राची फलके (वय 20), वैशाली क्षीरसागर (वय 20), मोनाली अलोणे (वय 27) आणि पन्नालाल बंदेवार (वय 50) यांचा मृत्यू झाला. तर, शितल चटप (वय 30), दानसा मरसकोल्हे (वय 26), श्रद्धा पाटील (वय 22), प्रमोद चवारे (वय 25) हे गंभीर जखमी आहेत.
काही महिन्यांपूर्वीच नागपूर जिल्ह्यातील कोंढाळीजवळ असलेल्या सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत बॉम्बस्फोटाची घटना घडली होती. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, यामध्ये इमारत उध्वस्त होऊन 9 जणांचा मृत्यू झाला होता. आजच्या या घटनेने त्या स्फोटाच्या घटनेतची पुनरावृत्ती झाली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली .पोलिसांनी रुग्णवाहिकेने सर्व जखमींना नागपूरकडे रवाना केले. यावेळी घटनास्थळी मोठा जमाव गोळा झाला होता. त्यांनी मृत आणि जखमींना अधिकाधिक मदत करण्याची मागणी केली. यासह प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी नागरिकांनी केली.