

Devendra Fadnavis on BMC mayor
नागपूर: मुंबईत महायुतीचाच, महायुतीचाच ,महायुतीचाच महापौर होणार असे तीनवेळा निक्षून सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.१३) पुन्हा एकदा महायुती अभेद्य असल्यावर माध्यमांशी बोलताना शिक्कामोर्तब केले.
मुंबईत राष्ट्रवादीचे नेतृत्व नवाब मालिक करीत असल्याने भाजपच्या नाराजी बाबत विचारले असता भाजपने या संदर्भात योग्य ती भूमिका आधीच स्पष्ट केली असल्यामुळे त्यावर पुन्हा बोलण्याची गरज नाही, असे सांगत आपला विरोधाचा सूर कायम ठेवला. नागपुरातील हिवाळी अधिवेशनात भरपूर कामकाज होत आहे. खूप चर्चाही झाली. विधेयके संमत झाली असे सांगत वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात शिवसेना नेते उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी विरोधाची भूमिका व्यक्त केली. याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. कुणाच्याही प्रतिक्रियांवर उत्तर देण्यास मुख्यमंत्री बांधील नाही असे सांगितले.
दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पत्र आपण वाचलेले नाही. मात्र, अल्पवयीन मुलीच्या संदर्भात सांगायचे म्हणजे 90 टक्के मुली घरी परत येतात. परंतु यासंदर्भात पोलिसात दाखल केलेल्या तक्रारी या कायम असतात असे मुख्यमंत्री म्हणाले. देशात मोदी सरकार अनेक सकारात्मक बदल करीत असून त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात बदल होत आहे.
मनरेगातील बदलाविषयी प्रियंका गांधी यांनी व्यक्त केलेल्या टीकेला त्यांनी बेदखल केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर्थिक सुधारण्याच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यांचा अनेकदा अर्थ चुकीचा निघतो, अशी पाठराखण केली. कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिवसेना असे दोनच प्रमुख पक्ष आहेत. मात्र अद्याप कुठलेही जागावाटप झाले नाही. फॉर्म्युला ठरलेला नाही. महायुतीचा विजय हाच आमचा फार्मुला असल्याचे फडणवीस म्हणाले.
मुंबईत कार्यकर्त्यांमध्ये लढण्याची मोठी स्पर्धा असली तरी एकत्रितपणे लढताना कुठलीही नाराजी नाही, असा दावा केला. मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणे हे महत्त्वाचे आहे. विकासात्मक पारदर्शी सरकार आणणे हे महत्त्वाचे आहे. आदिवासी मुलींच्या लग्न संदर्भात पालकांना धमकी प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे एका प्रश्नाचे उत्तरात सांगितले.