

minister chandrashekhar bawankule statement on chhagan bhujbal
नागपूर : राज्य मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर गेले अनेक दिवस नाराज असलेले ओबीसी नेते छगन भुजबळ यांना अखेर आज मंगळवारी मंत्रिमंडळात मंत्री करण्यात आले. वादग्रस्त ठरलेले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त जागा राष्ट्रवादी काँग्रेसने भुजबळांच्या रुपाने भरून काढली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार आणखी मजबूत झाले असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
मंत्री बावनकुळे म्हणाले, छगन भुजबळ राज्याचे महत्त्वाचे नेते आहेत. राज्याच्या राजकारणात नगरसेवक, महापौर ते उपमुख्यमंत्री असा मोठा राजकीय प्रवास त्यांनी केला. सरकारमध्ये त्यांनी सर्वच जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. छगन भुजबळ यांच्यासारख्या महत्त्वाच्या आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याला मंत्रिमंडळात संधी दिल्याने महायुती सरकार आणखी मजबूत होणार आहे. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली याचा आम्हाला आनंद असल्याचेही बावनकुळे म्हणाले. दुसरीकडे भुजबळांमुळे नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल का अशी विचारणा केली असता बावनकुळे यांनी ते काहीही सांगता येणार नाही असे स्पष्ट करून मौन बाळगले. हे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. ते योग्य वेळी घोषणा करतील, असे सांगून सावध पवित्रा स्वीकारला.
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर हिवाळी अधिवेशन निमित्ताने नागपूरमध्ये राजभवनात मंत्रिमंडळ घोषणा आणि शपथविधीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळांना डावलून मोठा धक्का दिला होता. दुसऱ्याच दिवशी भुजबळ उघडपणे नाराजी व्यक्त करून नागपूरचे अधिवेशन सोडून नाशिकला निघून गेले होते. त्यानंतर अजित पवार यांनी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला जाहीर करून नाराजी थोपवण्याचा प्रयत्न केला. मात्र भुजबळ शेवटपर्यंत अधिवेशनात परतले नाही.
पाकिस्तानच्या विरोधात आपली बाजू मांडण्यासाठी विविध देशांमध्ये पाठवण्यासाठी निवडण्यात आलेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या चमूवर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी टीका करणे अयोग्य आहे. ही टीम राजकीय नाही. विदेशात भारताची बाजू मांडण्यासाठी निवडण्यात आली आहे. गेली अनेक दशके पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या विरोधात लढाई सुरू आहे. हा संदेश जगभरात पोचवण्यात येत आहे. या प्रक्रियेमध्ये सर्व पक्षांना सोबत घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे बावनकुळे यांनी एका प्रश्नाचे देताना स्पष्ट केले.