

Pahalgam Terror Attack
नागपूर : काश्मिरातील पहलगाम येथील मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विविध टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून काश्मीर भागात गेलेले ५० पर्यटक श्रीनगर येथून आज गुरुवारी सकाळी मुंबई येथून नागपुरात सुखरूप परतले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर या प्रवाशांशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर एकीकडे आपल्या घरी परतल्याचा आनंद तर दुसरीकडे डोळ्याने अनुभवलेली श्रीनगर येथील नीरव शांतता डोळ्यात दिसत होती. रस्ता बंद झाल्याने अडकलेले बहुतांशी पर्यटक आता तिथून निघाल्याची माहिती त्यांनी दिली. श्रीनगर आता जवळपास रिकामे झाल्याचे सांगितले. अनेकांनी आधीच विमानाची तिकिटे बुक केली असून राज्य शासनानेही आपल्या खर्चाने विमानाची व्यवस्था केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी माध्यमांशी बोलताना पन्नासवर लोक श्रीनगर येथे सुखरूप असल्याची माहिती बुधवारी दिली. यातील अनेकजण रात्रीच्या विमानाने मुंबई आणि आज सकाळी नागपूरला परत येण्याची शक्यता व्यक्त केली होती.
नागपूरचे जरीपटका परिसरातील रुपचंदानी कुटुंबीय देखील सुखरूप पोहोचले. गोळीबाराचा आवाज ऐकून पळताना पाय घसरुन सिमरन रुपचंदानी या जखमी झाल्या. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर आहे. त्यांच्यासमवेत तिलक आणि गर्व रुपचंदानी असे तिघेही सुखरुप आहेत. यासोबतच कोराडी येथील पृथ्वीराज वाघमारे आणि इतर 7 कुटुंबीय, काटोल तालुक्यातील मूर्ती येथील प्रफुल्ल देशभ्रतार आणि कुटुंबीय असे अनेक नागपूर जिल्ह्यातील पर्यटक आता नागपुरात परत आले तर काहीजण येत आहेत.